न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२०) :- करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. दरम्यान ANI ने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. २४ तासात १४९ नवे रुग्ण आढळ्याने ही संख्या वाढली आहे.
तर महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १६७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १६७ वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.