न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहर रेडझोनमधून वगळल्यामुळे, उद्योग, व्यापार अशा सर्व स्तरावर अटी / शर्थीसह कामकाज सुरु करण्याची सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे कामासाठी अथवा खरेदीसाठी शहरातील नागरिक बाहेर पडणार असल्यामुळे रहदारी आणि संपर्क वाढणार आहे. आगामी काळात कोरोना संसर्ग वेगाने वाढला आणि विलागीकरण आणि उपचार याबाबतीत व्यवस्था अपुरी पडल्यास, नागरिकांमध्ये गोंधळ उडणार आहे. आनंदनगरमधील परिस्थितीमुळे येथील कोरोना बाधितांसाठी ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र १ व २ येथे विलगीकरण व्यवस्था उभारावी तसेच शहरातील सर्व नागरी वस्त्यांसाठी खबरदारी म्हणून प्रभागातील मंगल कार्यालयं, शाळा, कॉलेज यांचे वर्ग, सभागृह या ठिकाणी कोरोना उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून, आनंदनगर भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाबाधितांना तातडीने क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. या विभागात आनंदनगर वगळता मोरवाडी, इंदिरानगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर या नागरी वस्त्या आहेत. या सर्व विभागात कोरोनाचा फैलाव झाल्यास, कोरोनाबाधितांचे विलगीकरण करण्यासाठी मध्यवर्ती आणि एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने बेड्स ची व्यवस्था करता यावी याकरिता ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र १ आणि २ येथे व्यवस्था करणेबाबत तातडीने विचार व्हावा, असेही बाबर यांनी म्हटले आहे.
३१ मे पर्यंत लॉक डाऊन असला तरी पिंपरी चिंचवड शहर रेडझोन मधून वगळल्यामुळे, उद्योग, व्यापार अशा सर्व स्तरावर अटी/शर्थी सह कामकाज सुरु करणे बाबत सवलत देण्यात आली आहे. कामासाठी अथवा खरेदीसाठी शहरातील नागरिक बाहेर पडणार असल्यामुळे रहदारी आणि संपर्क वाढणार आहे. पुढील महिन्यापासून पावसाळा सुरु होणार आहे, असेही पावसाळ्यात साथीचे पेशंट वाढतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणि पर्यायाने कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढल्यास, विलगीकरण आणि उपचारासाठी हॉस्पिटल्स मधील बेड्स ची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे, असेही बाबर यांनी म्हटले आहे.
प्रत्येक प्रभागात विलगीकरण आणि उपचारासाठी मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज यांचे वर्ग आणि सभागृह याठिकाणी व्यवस्था करणे शक्य झाल्यास, संबंधित प्रभागातील कोरोनाबाधितांची त्याच विभागात व्यवस्था करता येईल. यामुळे महामारीच्या संकटकाळात, विषयाचे राजकारण होणार नाही तसेच कोरोना बाधितांची योग्य ती व्यवस्था करता येईल, असेही बाबर यांनी म्हटले आहे.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की लॉक डाऊन हा गतिरोधक असून आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लॉक डाऊन च्या काळात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी Capacity Building करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपण या बाबतीत या पूर्वीच प्रभागवार काही नियोजन केले असल्यास ते जाहीर करावे, त्याचा उपयोग नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना होईल तसेच त्यांच्या सूचना घेता येतील. आपण याबाबतीत तातडीने कार्यवाही करावी आणि तसे जाहीर निवेदन करावे अशी शिवसेना पक्षातर्फे आपणाकडे मागणी करीत आहोत. आगामी काळात कोरोना संसर्ग वेगाने वाढला आणि विलागीकरण आणि उपचार याबाबतीत व्यवस्था अपुरी पडल्यास, नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्यास आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याबाबतीत प्रशासन म्हणून आपण जबाबदार रहाल, असा इशारा योगेश बाबर यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना दिला आहे.