- चिखलीतील सामान्य कार्यकर्त्याच्या सांत्वनाला येऊन दाखविला मनाचा मोठेपणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कोरोनाची लागण झाल्यामुळे दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले, या पार्श्वभूमीवर साहेबांनी ही भेट घेतली. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. महानगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा ते प्रतिनिधीत्व करीत होते. सुमारे बावीस वर्षांपूर्वी महापालिकेतून गांवे वगळावीत म्हणून केलेल्या आंदोलनातून पुढे आलेले हे युवानेतृत्व दिवसेंदिवस बहरत गेले आणि लोकांच्या मनामनांत जावून रुजले. एक झुंजार, लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली होती. अशा कार्यकर्त्याच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटूंबाची हानी तर झालीच, त्याचबरोबर पक्षाचेही नुकसान झाले. त्यांच्या निधनाने चिखली परिसरातील सामान्य माणसाचा आधार गेला.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या दत्ता साने यांनी स्वकर्तृत्वावर सामाजिक व राजकीय जीवनात स्वतःचे स्थान निर्माण केले. राजकीय पडझडीतही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अशा धडाडीच्या कार्यकर्त्याचे जाणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेले. म्हणूनच शरद पवार साहेब आवर्जून सांत्वन करण्यासाठी चिखलीत त्यांच्या घरी आले.
खेड्यापाड्यातील, शहरातील अथवा झोपडीतही राहणाऱ्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता, त्यांची काळजी घेणारा नेता आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता.. अशी शरद पवार साहेबांची ख्याती आहे. मात्र त्यांच्या सध्याच्या वयाचा विचार करता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सद्यःस्थितीतील कोरोनाच्या साथीचा वाढता प्रभाव लक्षात घेता, या नेत्याची आजची पिंपरी -चिंचवडची भेट विलक्षण महत्त्वाची ठरते.
एखादा आजी माजी आमदार किंवा खासदार अथवा त्या ताकदीचा मोठा नेता यांच्या घरी एखाद्या नेत्यांनी जाणे, भेट देणे हे आपण समजू शकतो. परंतु आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्या पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या सामान्य, पण निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ आणि प्रोत्साहन देतानाच त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारा शरद पवारांसारखा नेता विरळाच असतो. शरद पवार साहेबांना “जाणता राजा” का म्हणतात, याचा काहीजणांना प्रश्न पडतो. मला वाटते त्याचे उत्तर त्यांच्या या सवयीमध्ये आहे. दुःखद प्रसंगी त्या कार्यकर्त्याला भेटून किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटूंबियांना भेटून विचारपूस करणे, घटनेची माहिती घेणे, त्यांना धीर देणे आणि त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणे ही वर्षानुवर्षे जपलेली त्यांची सहजप्रवृत्ती आहे. यामध्ये कुठलाही कृत्रिमपणा नसतो अथवा “इव्हेंटबाजी” नसते. उलट ओतप्रोत भरलेली माणूसकी आणि प्रेम दाटलेले असते. कधीकधी इच्छा असूनही एखाद्या वेळी कामाच्या व्यापात कुठे नाहीच जाता आले, तर किमान फोनवरून कार्यकर्त्याशी बोलून त्याचे दुःख हलके करण्याचा साहेब प्रयत्न करतात.
पिंपरी चिंचवडमधील भेटीमध्ये ते भोसरीतील जुन्या पिढीतील एक कारभारी, पैलवान विठोबा लांडे यांच्याही कुटूंबियांना भेटायला गेले. विठोबा लांडे हे १९७८ मध्ये तेव्हाच्या नगरपालिकेचे नगरसेवक होते. त्याहीपेक्षा शरद पवार साहेबांवर त्यांची अतोनात श्रद्धा होती. वारकरी सांप्रदायाच्या उत्कर्षासाठी त्यांचे भरीव योगदान आहे. वयाची शंभरी ओलांडून त्यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. माजी आमदार विलासराव लांडे यांचे ते पिता, त्यांच्याही घरी जावून साहेबांनी कुटूंबियांचे सांत्वन केले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना प्रेम देण्याची, कार्यकर्त्याला उभारी देण्याची साहेबांची ही धारणा अतुलनीय आहे. राजकारणासाठी नव्हे, तर सामाजिक भावनेतून साहेब वागत असतात, कृतीतून व्यक्त होत असतात.
एवढेच नव्हे तर, एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवली किंवा दुष्काळ, भूकंप अशा प्रसंगी, त्या संकटसमयी त्या परिसरातील नागरिकांना समक्ष भेटून, घटनेची खोलवर माहिती घेऊन प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना ते देतात. सत्ता असो वा नसो, महाराष्ट्रातील जनतेच्या काळजीपोटी वयाचा अथवा वातावरणाचा विचार न करता साहेबांच्या भेटीगाठी आणि दौरे सुरू असतात, हे सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या सर्वांना माहिती आहे.
मागिल वर्षी सांगली, कोल्हापूर परिसरातील महापूरामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तेव्हा कुठलाही विचार न करता हा जनतेचा नेता शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी धावून जातो, तेव्हा मी- मी म्हणणाऱ्यांच्या भुवया उंचावतात ! सांगली परिसरातील महापूराच्या संकटात साहेबांनी धावता दौरा केला नाही, तर तिथेच मुक्काम ठोकला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना आधार दिला. केवळ सरकारी मदतीसाठी साहेब पुढाकार घेतात असे नाही. तर अनेकदा स्वतःपासून सुरूवात करतात. पक्षाच्या वतीने निधीची व्यवस्था करतात. मग आपल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी आवाहन करतात. त्यानंतर शासनाला काय करायला पाहिजे ते सांगतात. म्हणूनच ‘साहेब आले’ हे दोनच शब्द दुःखाला वाट मोकळी करून देणारे असतात. त्यांच्या भेटीने अडचणीतील माणसाच्या मनाला उभारी मिळते आणि पुन्हा चांगले दिवस येतील हा आशावाद व आत्मविश्वास निर्माण होतो.
मागिल महिन्यात “निसर्ग” वादळ आणि अतीवृष्टीने कोकणात हाहाकार केला. शेतकऱ्यांच्या नारळी-पोफळीच्या बागा उध्वस्त झाल्या. अनेकांची घरेदारे उध्वस्त झाली. या कोरोनाच्या साथीने थैमान मांडलेले असतानाही हा नेता घरात थांबू शकला नाही. लोकमानसांत गेले पाहिजे, परिस्थितीचे अवलोकन केले पाहिजे, सरकारला योग्य त्या सुचना केल्या पाहिजेत या भूमिकेतून साहेब कोकणातील गांवपाड्यांत पोहोचले. शेतकऱ्यांना विश्वास दिला, प्रशासनाला सूचना दिल्या. पाठोपाठ पक्षाच्या वतीने मदतीचा हात दिला. लोकांच्यात जावून सुखदुःख समजावून घेण्याच्या त्यांच्या या सहजवृत्तीमूळेच साहेबांना “लोकनेता” म्हणतात.
एखादी मोठी आपत्ती अथवा दुर्घटना घडल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांना आता काय करावे, याचे उत्तर शोधण्यास आणि विचार करण्यास वेळ लागतो. तोपर्यंत साहेबांनी तेथील दौरा करून, माहिती घेऊन, आवश्यक त्या उपाययोजना सुचविलेल्या असतात. संकटात सापडलेल्या जीवाला आधार देणारा, असा हा विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा नेता.. सत्ता असो अथवा नसो, पक्षभेद, मतभेद, स्वतःचे वय सारे विसरून माणूस उभा करण्यासाठी साहेब धावून जातात, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अलौकिकत्व सुस्पष्ट होते.
साहेबांच्या राजकीय कौशल्याचे आणि चातुर्याचे गुणगान केले जाते किंवा त्यांच्या राजकीय डावपेचांवर भरभरून टीकाही केली जाते. पण राजकारणाच्या पलिकडे जावून सामाजिक जाणिवा सांभाळण्याचे त्यांचे कसब किंवा खुबी कधी कोणी समजून घेतली नाही. एखादे नैसर्गिक संकट आल्यावर किंवा दुःखद घटना घडल्यावर साहेबांचे काळजीपोटी वितळणारे मन खूप कमी लोकांनी पाहिले असेल.
अलिकडेच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले होते. साहेबांनी पक्षाच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात, त्यांच्या डब्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेण्याची सुचना केली. अर्थातच राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरेख नियोजन करून त्या भुकेल्या जीवांना अडचणीच्या काळात दोन घास भरविण्याची व्यवस्था झाली. हे काम एवढे सोपे नसते, कोणी ठरवून तसे करावे म्हणून जमणारे नसते. त्यासाठी मनाची खोली आणि व्यापकता मोठी असावी लागते. माणूसकीची जाण आणि परिस्थितीचे भान जागृत असावे लागते.
स्वतःच्या अमृतमहोत्सवाचे सोहळे चालू असताना, वयाच्या शंभरीकडे कललेल्या आणि सामान्य परिस्थितीत आयुष्य कंठणाऱ्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकरांसारख्या थकलेल्या कलाकाराची आस्थेने विचारपूस करण्यासाठी धावून जाणारे साहेब समजून घ्यायला हवेत. हा माणूसकीचा गहिवर कुठल्याही सत्तेच्या खुर्चीत बसून समजत नाही, तर त्यासाठी मुळातच तो सामाजिक संस्कार अथवा पिंड असावा लागतो. त्याचबरोबर त्या कलाकाराचे समाजासाठीचे योगदान जाणले पाहिजे. साहेबांच्या ठायी ती जाण आणि सामाजिक भान आषाढमेघांप्रमाणे आकंठ भरलेले आहे.
राज्य व देशपातळीवरील असंख्य लहानमोठया प्रश्नांचा गुंता सोडविताना आणि शेकडो विषयांच्या सतत चालणाऱ्या चर्चा, बैठका, नियोजन, शासन, प्रशासन, पक्षसंघटना, विविध संस्थांची जबाबदारी सांभाळताना सामान्य माणसाची काळजी वाहणे, सामान्य कार्यकर्त्याची विचारपूस करणे हे सामान्य कार्य नव्हे. कामाच्या प्रचंड व्यापातून वेळ काढून ही माणूसकी जपण्यासाठी हृदयात ओलावा आणि कृतीत उत्साह असावा लागतो, तो शरद पवार साहेबांच्यात वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षीही ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते, चैतन्य लाभते, मनाला उभारी मिळते. त्यासाठीच शरद पवार नावाचे अलौकिक व्यक्तिमत्व जवळून अनुभवावे लागते. साहेबांच्या सहवासात राहताना राजकारणापलिकडील साहेब उघड्या डोळ्यांनी टिपावे लागतात. म्हणूनच आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात आणि हृदयात साहेबांनी आयुष्यभर अढळस्थान निर्माण केलेले आहे.
– मा. अरुण बोऱ्हाडे (राष्ट्रवादी कार्यकर्ते)