- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जनआंदोलनाचा दिला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- चिखली आणि कुदळवाडी परिसरात होणारा पाणीपुरवठा दुषित आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करावी. येत्या १५ दिवसांत पाणी तक्रारी मार्गी लावा, अन्यथा महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका फ-प्रभाग पाणीपुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रभागात गेल्या आठवड्यापासून दूषित पाणी येत आहे. परिणामी अनेक नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून जुलाब उलट्या पोटदुखी असे आजार वाढले आहेत. आधीच करोनाने हैराण झालेल्या नागरिकांना आता दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
परिसरात गढूळ व दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जावा. आधीच एकदिवसाआड पाणी व तोही दूषित त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. येत्या पंधरा दिवसात दूषित पाणी पुरवठा बंद न झाल्यास महेशदादा लांडगे युवा मंचाच्या वतीने जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही दिनेश यादव यांनी दिला आहे.