न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.
यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.