- दंडासह कडक शिक्षेची महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- चांगल्या दर्जाचा मास्क तोंड आणि नाकावर व्यवस्थितपणे लावल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही. असे असूनही विशेषतः तरुण मुले तोंडाला मास्क न लावता बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे चित्र आहे. अशांवर दंडासह कडक शिक्षेची अंमलबजावणी केली जावी. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
पुणे जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक गुरूवारी (दि. ३०) पुण्यात झाली. त्या बैठकीत महापौरांनी पिंपरी – चिंचवड शहराबाबत प्रमुख मुद्दे उपस्थित केले.
महापौर म्हणाल्या की, मास्क न लावणाऱ्यांना ५०० रूपये दंड केला जातो. तरीही तरूण मुले मास्क न लावता. केवळ मानेवर अडकवून फिरत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहेत. योग्य प्रकारे मास्क न लावल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी दंडासह कठोर शिक्षा केली जावी, अशी सूचना त्यांनी केली. संसर्ग होऊन नये म्हणून पालिकेने तातडीने पावले उचलत तब्बल १५ लाख मास्कचे वितरण झोपडपट्टी परिसरात केले. तसेच, देहू गावासाठी २ लाख मास्क दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. शहरात व्हेंटीलेटरअभावी सुरूवातीच्या टप्प्यात २ ते ३ रूग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो रूग्णालय उभारले जाणार आहेत. मात्र, त्यापेक्षा इमारती, मंगल कार्यालय, हॉटेल, सभागृह इमारतीमध्ये रूग्णालय उभारण्यास कमी कालावधी लागेल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.