न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पर्यटकांना पर्यटनस्थळांवर येण्यास मज्जाव केल्यानंतर मुळशी, मावळात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. जिल्हाबंदीचे आदेश धुडकावून पर्यटक गर्दी करत असल्याने प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवडय़ात मुळशी, मावळात पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगररांगांमधून धबधबे वाहू लागले आहेत. शनिवारी आणि रविवारी या भागात मुंबई-पुण्यातील पर्यटक गर्दी करत आहेत. टाळेबंदी मागे घेण्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी जिल्हाबंदी कायम आहे. अन्य जिल्ह्य़ातून पुणे जिल्ह्य़ात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रवास परवाना असल्याशिवाय जिल्ह्य़ात प्रवेश देण्यात येत नाही.
जिल्हाबंदीचे आदेश धुडाकावून गेल्या आठवडय़ापासून मुळशी, मावळ भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांमध्ये युवक-युवतींची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. मुळशीतील ताम्हिणी घाट, पौड भाग तसेच लोणावळ्यातील सहारा पूल धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉईंट, राजमाची गार्डन,भाजे धबधबा,पवना धरण, आंदर मावळ परिसरात सध्या गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळा शहर, ग्रामीण भाग, कामशेत, वडगाव भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व पथकाने बंदोबस्त लावला आहे.