- नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे शासनाचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- मुंबईत झालेल्या बैठकीनंतर बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी लवकर व्हावी यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आज (दि. १३) बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत रणनीती ठरविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकी विषयी डॉ. कोल्हे यांनी ही माहिती दिली. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्याने ग्रामीण अर्थचक्र थांबले आहे. शिवाय गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. त्यामुळे या बैलगाडा शर्यतीवरील बंदी शासनाने उठवावी, असे खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे.
या बैठकीला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, अवरसचिव, सहसचिव आदी उपस्थित होते.