न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक दिलासा देणारी घोषणा केली आहे. मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्चपासून लागू केलेल्या टाळेबंदीचा विचार करून राज्यातील प्रवासी वाहनांना वार्षिक वाहन करात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.
३१ मार्च २०२० ला मागील आर्थिक वर्षाचा पूर्ण वाहन कर जमा केला असेल त्यांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे. २३ मार्च २०२० पासून पुढे सलग साडेचार महिने कमी – अधिक प्रमाणात टाळेबंदी होतीच. त्यामुळे वाहन करता किमान सहा महिन्याची सवलत मिळावी अशी या व्यवसाय क्षेत्राची मागणी होती. उत्पन्न बंद असल्याने कर जमा करणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे होते.
सरकारने त्याची दखल घेऊन त्यांना सहा महिन्यांचा कर माफ केला आहे. कोरोना काळात आधीच अडचणीत सापडलेल्या मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे.