न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमनातील तरतुदीनुसार प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी प्राथमिक आणि उच्च प्राथमिकसाठी ६ ते ८ या गटातील पदांसाठी केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. त्यानुसार माध्यमिक शाळांना जोडलेले पाचवीचे वर्ग आता प्राथमिक शाळांना जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर शाळांतील शिक्षकांचे समायोजनही केले जाणार आहे.
याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदींचा विचार करून, ज्या माध्यमिक शाळा पाचवी वर्गापासून आहेत, त्या शाळांतील पाचवी वर्ग नजीकच्या एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेत जोडण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. यानुसार हा बदल केला जाणार आहे.
माध्यमिक शाळांमधील पाचवीचे वर्ग जवळच्या एक किलोमीटर अंतरावरील चौथीपर्यंत असलेल्या शाळांना जोडले जाणार आहे. पहिली ते पाचवीचे वर्ग प्राथमिक आणि सहावी ते आठवी उच्च प्राथमिक अशा गटातील पदांसाठी केंद्राने नवे निकष लागू केले आहेत.