- महाराष्ट्राची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’- खा. अमोल कोल्हे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- “करोनाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. एकूण २२ टक्के केसेस आणि ३७ टक्के मृत्यु महाराष्ट्रात होत आहेत. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र करोनाशी लढा देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही परिस्थिती आणखी खराब होऊ शकते, हा धोका लक्षात घेता केंद्रानं महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यायला हवं. मात्र त्याउलट १ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने महाराष्ट्राची व्हेंटिलेटर्स, पीपीई किट, टेस्टिंग किट, एन ९५ मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत आहे,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं. लोकसभेत करोना प्रादुर्भावासंबंधी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
“महाराष्ट्राचे नागरिक या देशाचे रहिवासी नाहीत का? केंद्राची त्यांच्याप्रती काहीे जबाबदारी नाही का?,” अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला करोनाशी लढण्यासाठी तातडीने पुरवठा करावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली.
“देशात ३० जानेवारी रोजी कोरोनाची पहिली केस आढळली. आज ९ महिन्यांनतर नेमकी काय स्थिती आहे. आपला रिकव्हरी रेट चांगला आहे किंवा मृत्युदर देखील कमी आहे हे सांगून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकते. परंतु या आकड्यांच्या मागे लपून आपण करोनामुळे ९० हजार देशवासियांनी आपले प्राण गमावले आहेत ही वस्तुस्थिती नाकारु शकत नाही,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
“जेव्हा देशात कोरोनाचा विषाणू हातपाय पसरवत होता, तेंव्हा आपण अमेरिकच्या राष्ट्रध्यक्षाच्या स्वागत समारंभात व्यस्त होता. देशाचे आरोग्य सांभाळण्याची गरज असताना आपण राज्यांतील सरकारे पाडण्याच्या कामात व्यस्त होता. याचा दुष्परिणाम देशातील प्रत्येक नागरिकाला सध्या भोगावा लागत आहे. मात्र, दुरदृष्टी दाखवत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट केली असती तर आज ही वेळ आली नसती अशी टीका करताना एका सरप्राईज इव्हेंटप्रमाणे लॉकडाउन थोपवण्यात आला,” अशी टीका त्यांनी केली.