न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी च-होलीवासीयांनी एकत्र येत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्याला सर्व ग्रामस्थ, व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे परिसरातील सर्व रस्ते, चौक तसेच भाजीमंडईचा परिसर निर्मनुष्य दिसून आला.
च-होली येथील मुख्य वेताळ बुवा चौक, भाजी मंडई परिसर असलेला श्रीमंत दाभाडे सरकार चौकात शुकशुकाट होता. नागरिकांनी शंभर टक्के जनता कर्फ्यू पळत घराबाहेर पडणे टाळले आहे. आळंदी पालखी मार्गावरील च-होली फाटा, साई मंदिर कोतवालवाडी चौकसुद्धा मोकळे पडले होते. तुरळक वाहने दिसली तरी अत्यावश्यक काम असल्यामुळे ती बाहेर पडली असल्याचे सांगितले.
करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी गुरुवार (दि. २४), शनिवार (दि. २६) पर्यंत सलग तीन दिवस शंभर टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये फक्त दवाखाने, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. इतर भाजी व किराणामालासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. च-होली ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे संदेशही देण्यात येत आहे.