- अन्यथा नवख्या भाजपला शिवसेना स्टाईल दाखवू..
- शिवसेनेच्या विजय गुप्तांकडून भाजपाईचा खरपूस समाचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या भाजपच्या धेंड्यांना राज्यात जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडविण्याचे काम करायचे आहे काय? त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल शिवसेनेचे पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
त्यात गुप्ता यांनी म्हटले आहे की, ‘लोकशाहीप्रधान देशात भाजपला केवळ साडेतीन टक्के लोकांचे हित साधायचे आहे. त्यासाठी त्यांना हिंदुत्व या मुद्द्याचे राजकारण करायचे आहे. छत्रपतींच्या स्वराज्यात समाजातील अठरापगड जातींनी योगदान दिले. प्रसंगी आपले रक्त या भूमीवर सांडले. छत्रपतींनी हिंदुत्व मुद्द्यावरून कधीही जातीभेद केला नाही. मुस्लिमांनाही स्वराज्यात मानाचे स्थान दिले. भाजपचे हात हिंदुत्त्वाची पताका सावरण्यात गुंतले आहेत. मात्र त्यात त्यांना मुस्लीम बांधव नकोत. छत्रपतींचे विचार रुजलेली व अंगीकारलेली शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करीतच राहणार आहे.
राज्यातील जनता व आमच्यासारखा खरा शिवसैनिक राज्याचे मुखमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी ठाम उभा असताना हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या त्या उपटसुंभ्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय? सर्वप्रथम तुमच्या ५६ इंच छातीचे आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्द्यावरून मवाळ कसे काय झाले? त्यांनी जनतेला दिलेल्या विकासाच्या मुद्द्यांचे काय झाले व विकासावरून हिंदुत्व मुद्द्यावर ते कसे काय आले? ते जनतेला आधी सांगा. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जात, राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकीत आहे. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करीत असताना महाराष्ट्रात शेती, शिक्षण, पाणी, उद्योग अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ठोस पावले उचलीत आहेत. इतक्या वर्षांत जे घडले नाही, ते उद्धवसाहेबांनी करून दाखवले. तेच या भाजप नेत्यांना पाहवत नाही, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.
सुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे लोक मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत. राज्यात वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे भाजपची सत्ता असताना ही संकल्पना भाजपला का सुचली नाही? याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे. उठसूट कोणतेही कारण नसताना आमच्या नेतृत्वावर केलेली चिखलफेक आम्ही सहन करणार नाही. भाजपने आपल्या लायकीत रहावे, अन्यथा शिवसेना स्टाईल काय असते हे नवख्या भाजपला दाखवून देऊ.
– विजय गुप्ता (समन्वयक – शिवसेना पिंपरी विधानसभा)…