न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस अनावश्यक हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. असा हस्तक्षेप टाळण्याबाबत पोलीस ठाणे प्रमुखांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सूचना दिल्या आहेत. जमिनीच्या वादात पोलीस ठाणे स्तरावर परस्पर गुन्हे दाखल करू नयेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
आयटी पार्क तसेच एमआयडीसीमुळे पिंपरी – चिंचवड शहर व परिसराचा झपाट्याने विकास व विस्तार झाला. त्यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. परिणामी जमिनीशी संबंधित वादाचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी थेट हस्तक्षेप करण्याची गरज नाही तसेच तशी तरतूदही नाही. असे असतानाही यात पोलिसांचा अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे.
वाद दिवाणी स्वरूपाचा असतानाही त्याला फौजदारी स्वरूप दिले जाते. गरज नसताना ठाणे स्तरावर गुन्हे दाखल केले जातात. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जमिन हक्क, ताबा, कब्जा यासंबंधी अर्ज प्राप्त झाल्यास त्या अर्जाची चौकशी करावी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याबाबतचा अहवाल सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्फतीने पोलीस उपायुक्त यांच्याकडे पाठवावा. या अहवालामध्ये वरिष्ठ निरीक्षक आणि सहायक आयुक्त यांनी गुन्हा दाखल करणेबाबत किंवा न करणेबाबत मोघम मत न मांडता आपला अभिप्राय स्पष्टपणे नमूद करावा. त्यानंतर उपायुक्त यांनी पोलीस आयुक्तांना प्रकरणाबाबतच्या दोन्ही बाजूंची माहिती द्यावी. त्यानंतर उपायुक्तांनी निर्णय घ्यावा. काही प्रकरणात फौजदारी गुन्हा निष्पन्न होत असूनही त्याला दिवाणी स्वरूप दिले जाते. याबाबत दररोज तीन ते चार तक्रारी येत आहेत. याची आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन काही प्रकरणांची स्वत: माहिती घेतली आहे.