न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- दिवाळीमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू केले आहे. सध्या एसटीला मिळणारा प्रतिसाद नेहमीप्रमाणे नसला तरी दिवाळीमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबरपासून राज्यात सर्व आगारांतून जादा बस सोडण्याच्या सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत.
एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्या, गणेशोत्सव, दिवाळी या कालावधीत जादा बस सोडण्यात येतात. महसुल मिळवून देणारा हा कालावधी असल्याने एसटीकडून विशेष नियोजन केले जाते. पण यावर्षी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन कालावधीत एसटी सेवा ठप्प होती.
त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बस बंद राहिल्या. तसेच गणेशोत्सवातही अपेक्षेपेक्षा खुप कमी प्रतिसाद मिळाला. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भितीही कमी झाली असून पुरेशी दक्षता घेत प्रवास केला जात आहे.