- शेतीच्या कामावर मोठा परिणाम; गावांमधून गस्तही सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- नगर आणि बीड जिल्ह्य़ात बिबटय़ांनी दहशत निर्माण केली आहे. गेल्या महिनाभरात बिबटय़ांच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. शेतकऱ्यांची अनेक दुभती जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. काही गावांमधून गस्त सुरू झाली आहे.
नगर शहराजवळ बिबटय़ाचा उपद्रव प्रथमच जाणवू लागला. मात्र बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यात वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. बिबटय़ाचा उपद्रव पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, नगर, बीड या जिल्ह्य़ांत आहे. बिबटय़ाचा समावेश वन्यजीवांच्या अधिसूची एकमध्ये असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात अनेक अडचणी-मर्यादा जाणवत आहेत.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणीचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे उसाच्या आश्रयाला आलेले बिबटे बाहेर येऊ लागले आहेत. बिबटय़ांच्या ‘ब्रीडिंग सीझन’ सुरू आहे. त्यातून हल्ले वाढत आहेत. मात्र आता उसाचे क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणीही बिबटे आढळत आहेत, त्यांचे हल्ले होत आहेत. शेतात सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. पिकाला पाणी दिले जात आहे. शेतीची कामे जोरात सुरू आहेत, अशाच वेळी बिबटय़ांचे हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्य़ाच्या गोदावरी, प्रवरा नदीच्या पट्टय़ात अनेक बिबटे आढळतात, परंतु आता नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जत या दुष्काळी पट्टय़ातही बिबटे आढळत आहेत. बिबटय़ाच्या लागोपाठ हल्ल्यात पाथर्डीतील तीन लहान मुले मृत्युमुखी पडली. त्यानंतर लगतच्या आष्टी तालुक्यात गेल्या आठवडाभरात झाले तीन जण ठार झाले. पाथर्डीतील घटनेने बिबटय़ा नरभक्षक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.