न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावर मात करून यंदा बारावी व दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे. ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासंदर्भात शिक्षक मुख्याध्यापक शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय सुरु असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात २३ नोव्हेंबरपसून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असून, सद्यस्थितीत ५ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थिती दर्शवित आहेत. मात्र, असे असले, तरी पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.