- तिजोरीत खडखडाट असताना एवढा खर्च होणे शक्यच नाही – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- कोरोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं राज्य आर्थिक संकटात असताना सरकार मधील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. यावरुन विरोधी पक्षांनी नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
मंत्र्यांच्या बंगल्यावर ९० कोटी रुपये खर्च झालेलाच नाहीत. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली. काहीही बातम्या दिल्या जातात. अद्याप कुठलाही आकडा पुढे आलेला नाही, मग हा ९० कोटी खर्चाचा आकडा आला कुठून ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या सरकार मधील मंत्री आपापल्या सोयीनुसार व आवडीनुसार शासकीय बंगल्यांमध्ये व कार्यालयांमध्ये बदल करत असतात. त्यावर खर्चही बराच होतो. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही. मात्र, मंत्र्यांचे बंगले व दालनांची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून त्यांची देयकेही दिली जात असल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.