- रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींकडून राज्य परिवहन आयुक्तांचे अभिनव पद्धतीने स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- कोविडमुळे रिक्षा व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. रिक्षा चालवल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही, अशी रिक्षाचालकांची अवस्था आहे. हातावर पोट असणारा हा घटक गेल्या आठ महिन्यांपासून काय करत असेल, तो कसा जगत असेल, याबाबत साधी विचारपूस देखील कोणी करत नाही. कर्ज काढून रिक्षा घेतली. रिक्षाचे हप्ते कसे भरायचे? यात फायनान्स कंपनीच्या गुंडांचा वसुलीसाठी होणारा सततचा त्रास अशा असंख्य प्रश्नांने सध्या रिक्षाचालक ग्रासला आहे. अनेकांनी रिक्षा बंद ठेवून मजुरी, फळभाजी विकणे अशी कामे सुरू केली आहेत. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत रिक्षाचालक असून रिक्षा हे वाहन नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा समस्यांचा पाढा महाराष्ट्र रिक्षा पंचायतिचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासमोर वाचला.
पुणे येथील रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीनी मुंबई येथे जाऊन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आणि रिक्षाची प्रतिकृती डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे देत आता रिक्षाचे भवितव्य तुमच्या हातात आहे? तुम्ही रिक्षा व्यवसाय वाचवू शकतात अशी भावना व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, उपाध्यक्ष आणि समर्थ शिक्षा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे रिक्षाचालकांचे जगच बदलले आहे. रिक्षा व्यवसाय आणि रिक्षा चालक आर्थिक अडचणीमध्ये आहे. रिक्षा व्यवसायाबाबत नव्याने धोरण ठरवावे लागेल आणि भविष्यात धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील तरच रिक्षा व्यवसाय जिवंत राहील. यासाठी प्रशासन पातळीवरील अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही, असेही बाबा कांबळे म्हणाले.