- विशेष फेरीतील प्रवेशासाठी अर्ज भरण्यासही मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) राखीव जागांवर प्रवेश देण्याच्या शासन निर्णयानंतर अकरावीच्या विशेष फेरीची गुरुवारी जाहीर होणारी प्रवेश यादी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर विशेष फेरीतील प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्राअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर अकरावीच्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
नियोजित वेळापत्रकानुसार विशेष फेरीची प्रवेश यादी गुरुवारी जाहीर होणार होती. मात्र, राज्य शासनाने सामाजिक-आर्थिक दुर्बल प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांवर प्रवेश घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे विशेष फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून गुरुवारी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही. विशेष फेरीसाठी अर्ज करण्याचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.