- बुलंद लोकशाहीसाठी आता खरा आवाज उठविण्याची वेळ आली – संदीप काटे..
- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेची अभिनव परंपरा यंदाही जपत शाळेच्या जेष्ठ शिक्षिका दीप्ती विश्वास बक्षी यांच्या हस्ते तिरंगा फडकावला गेला. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या शानदार सोहळ्यास ऑनलाईन हजेरी लावली.
संदीप काटे म्हणाले की, स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरु होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीनं राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं. याच दिवशी लोकशाही पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात देशात झाली. म्हणून याच दिवशी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, हे करीत असताना लोकशाहीचा विसर पडताना दिसत आहे. आज देशात सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन त्याचेच द्योतक आहे. नागरिकांनी बुलंद लोकशाहीसाठी खरा आवाज उठविण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी सज्ज व्हावे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांनी आजच्या दिनाचे महत्व विषद केले. कोरोनाचा यशस्वीपणे सामना करीत असताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही. त्यासाठी शिक्षकवर्ग खंबीर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, पूर्व प्राथमिक विभागाच्या पलक गांधी, सुचिता करंजवाला, प्राथमिक विभागाच्या अपर्णा सरवटे, वैशाली गांधी व शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली देशपांडे यांनी केले.