- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान वाढवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शत्रुचा सामना करून त्यांनी असंख्य लढाया जिंकल्या. लढाया करताना आलेला कठीण प्रसंग आणि शत्रुने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्याचे त्यांचे कौशल्य बरेच काही शिकवून जाते. त्यापासूनच आपल्याला कोरोनासारख्या महाभयंकर विषाणुला देखील हरविण्याची शक्ती मिळाली, असे गौरवोद्गार युवा नेते संदीप काटे यांनी काढले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये कोविड प्रादुर्भावाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी अर्जुन काटे, संतोष काटे, आकाश जगताप, महेश तारु, विकास गवळे यांच्या हस्ते महाराजांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले.
संदीप काटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून आजच्या तरुणांसाठी उर्जेचा स्त्रोत आहे. महाराजांच्या पराक्रमाचे जेवढे दाखले द्यावे, तेवढे कमीच आहेत. परंतु, त्यांच्याकडे आर्किटेक्चर, सोशल इंजिनिअर, कायदे तज्ञ, उद्योजक, कृषी तज्ञ अशा वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेली निपुणता दृष्टीपथास येते. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कित्येक राष्ट्रांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.
सध्या कोरोनाचे सावट आहे. अशा भयंकर विषाणुवर मात करण्याचे कौशल्य देखील आपल्याला शिवरायांमुळेच मिळाले. महारोगाची साथ आल्यानंतर त्यावर कशा प्रकारे मात करायची याचे दाखले देखील इतिहासात सापडतात. त्यापासून प्रेरणा घेऊन आपण आज कोरोना विषाणुवर मात करून स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन काटे यांनी यावेळी केले.