- रास्त भाव धान्य दुकानदारांची होतेय कोंडी – विजय गुप्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडे सध्या धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मार्च महिन्यातील धान्य वाटप पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यातील धान्य वाटप बुधवारपासून (दि. ७) सुरू होणार आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, धान्याचा अतिरिक्त साठा मात्र अद्याप रेशन दुकानदाराना उपलब्ध देण्यात आलेला नाही.
शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडून सध्या अंत्योदय आणि अनसुरक्षा योजनेतील कार्डधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. या योजनेतंर्गत प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिला जात आहे. गहू २ रुपये किलो तर, तांदुळ ३ रुपये किलो या दराने दिला जात आहे. शहरामध्ये निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयातंर्गत ‘ अ ‘ विभागात ९४ तर, ‘ ज ‘ विभागात ७७ रास्त भाव धान्याची दुकाने आहेत. या धान्य दुकानामधून माचे महिन्यातील धान्यसाठ्याचे वितरण रविवारी (दि. ४) पूर्ण करण्यात आले.
एप्रिल महिन्यातील धान्यही वितरणासाठी रास्त भाव धान्य दुकानदारांना प्राप्त झाले आहे. या धान्याचे वाटप बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात कडक निर्बंध जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना गरजेनुसार धान्य पुरवठा करायचा झाल्यास त्यासाठी अतिरिक्त धान्य साठ्याची मात्र अद्याप तजवीज करण्यात आली नाही.
सध्या करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता धान्य वाटप करताना बायोमेट्रिक यंत्रणेनुसार दुकानदारांच्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा की नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वितरण करायचे, याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या मार्च महिन्यातील धान्य वाटप पूर्ण झालेले आहे. एप्रिलमधील धान्य वाटप बुधवारपासून सुरू होणार आहे.
-विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेअरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशन.