- मंडळ शिक्षणमंत्र्यांची १५ जुलैची डेडलाईन पळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार असून, त्याची अंतिम तपासणी सुरू आहे. त्यामुळे दहावीचा निकाल याच आठवड्यात १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात एखादा दिवस पुढे – मागे होऊ शकतो, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.
यंदा दहावीची परीक्षा रद्द करून निकालासाठी नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, दहावीचे प्रात्यक्षिक किंवा तोंडी मूल्यमापन २० गुण, असा फॉर्म्युला ठरविण्यात आला. निकाल तयार करण्यासाठी शाळास्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या. निकाल तयार करून विषयनिहाय गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. काही शाळांना अडचणी आल्या. त्या विभागीय मंडळ व राज्य मंडळाकडून सोडविण्यात आल्या. काही शाळांमध्ये गुण भरताना चुका झाल्या होत्या. संबंधित शाळांना चुका दुरुस्त करून निकाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
निकाल शाळास्तरावरून विभागीय मंडळाकडे आलेले असून, त्याची तपासणी सुरू आहे. निकालात काही त्रुटी राहू नयेत, यादृष्टीने योग्य ती दक्षता घेतली जात आहे. निकालाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालासाठी १५ जुलैची डेडलाइन निचित केली होती. ही डेडलाइन पाळण्याचा राज्य मंडळ प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.