- मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाकडून मागितला अहवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंधात सूट देण्याबाबत राज्य सरकार फेरविचार करणार आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच यावेळी आरोग्य विभागाला प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभाग त्यावर काम करत असून, दोन – तीन दिवसात हा अहवाल आपत्ती व्यवस्थापन व टास्क फोर्सकडे सादर केला जाणार आहे.
येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन शुक्रवारपर्यंत याची अधिसूचना निघू शकते. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबईत लोकल प्रवासासाठी सूट मिळू शकते. कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागताच राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध उठवताना पाच स्तरांचे निर्बंध घोषित केले. निर्बंध शिथिल केल्यापासून सात आठवड्यांचा कालावधी लोटला आहे.
राज्यभरात मागील सात आठवड्यापासून तिसऱ्या किंवा त्यावरच्या स्तरातील निर्बंध सुरू आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्येत विशेष फरक पडलेला नाही. सध्या राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आढळून येत आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांतील रुग्णसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे २ ते ३ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागांना, जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.