- ४५ प्रवाशांचा ग्रुप असल्यास थेट एसटी गावात पोहोचणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- गौरी – गणपती सणानिमित्त एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून ७ ते १ सप्टेंबरदरम्यान कोकणासाठी नऊ जादा बसेस धावणार आहेत. ज्यादा बसचे नियोजन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोकणवासीय वास्तव्यास आहेत. यामुळे कोकण परिसरामध्ये आगारातून सुमारे २५ टक्के बस सोडण्यात येतात. यामध्ये चिपळूण, दापोली, देवरुख, गुहागर, खेड, महाड, रत्नागिरी या ठिकाणी बसेस ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान धावणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता पुन्हा महामंडळाच्या बस सुरू झाल्या आहेत.
मागील महिन्यात कोकणात पूरस्थिती निर्माण झाली होती. गौरी, गणपतीनिमित्त गावी जाणाऱ्या ४५ प्रवाशांचा ग्रुप असल्यास अशा प्रवाशांना एक बस उपलब्ध करून देण्यात येईल. थेट मूळ गावापर्यंत ही बस प्रवाशांना सोडणार आहे. अशा प्रवाशांचा ग्रुप असल्यास त्यांनी बल्लभनगर आगाराशी संपर्क करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.