- मुसळधार पावसामुळे धरणातून सोमवारी ५५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२१) :- मागील आठ दिवसांतील मुसळधार पावसामुळे पवना धरण यंदा सप्टेंबरमध्ये १०० टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पवना धरणातून सोमवारी (दि. १३) १३५० क्युसेक विसर्ग वीज र्निमिती संचाद्वारे साेडण्यात आलेला आहे.
मुसळधार पावसामुळे आणि धरणातील पाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता दुपारी २.०० नंतर सांडव्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग वाढवुन ४२०० क्युसेक असा एकूण ५५५० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे.
पवना धरणात यंदा सप्टेंबर महिन्यात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन दुपारपासून विसर्ग करण्यात आला. धरणाच्या खालील बाजूस नदीतीराकडील सर्व गावांतील नागरिकांनी दक्ष राहावे. नदीकाठावरील जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी. कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पवना पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि परिस्थितीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत पावसाचे प्रमाण कायम असणार असल्याने पवना नदीकाठच्या रहिवाशांनी दक्षता बाळगावी.