- तीन महिन्यात रक्कम परत मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- ठेव विमा महामंडळाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार रुपी बँकेच्या पाच लाखापर्यंत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचे सुमारे ९६५ कोटी रुपये लवकरच परत मिळतील, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली. त्यामुळे रुपी बँकेत रक्कम अडकून पडलेल्या आणि ती मिळण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बँकेच्या सर्व ठेवीदारांनी बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध केलेल्या विहित नमुन्यातील क्लेम अर्ज दोन प्रतींमध्ये सादर करण्याचे आवाहन रुपी बँकचे सरव्यवस्थापक नितीन लोखंडे यांनी केले आहे. अर्जासोबत केवायसी कागदपत्रे, तसेच ठेव पावतीची पाठपोट झेरॉक्स, सेव्हिंग पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी स्व – साक्षांकित करूनच द्यावयाची आहे.
तसेच, त्यांच्या दुसऱ्या अथवा अन्य बँकेत असणाऱ्या बचत अथवा चालू खात्याचा कोरा चेक, सही न करता कॅन्सल करून द्यावे. जर चेक नसेल तर त्या बँकेतील खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत सादर करावी, असे त्यांनी सांगितले. अर्जाची छाननी शाखा स्तरावर तसेच बँकेच्या मुख्य कचेरीकडून केली जाईल. तो ठेव विमा महामंडळाकडे १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच पाठवायचे आहेत. त्यावर मिळणाऱ्या सूचनांप्रमाणे अर्जावर बँकेकडून पुढील कार्यवाही केली जाईल. संपूर्ण प्रक्रियेस साधारणतः ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.