- प्राथमिक शाळांबाबत निर्णय नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती.
शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं.
ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.