- राज्य शासनाच्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर टांगती तलवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या राज शासन निर्णयाला पुण्यातील परिवर्तन संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी – निजामपूर, पनवेल, मीरा – भाईंदर, पिंपरी – चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड – वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.
राज्य सरकारने या निवडणुकांसाठी केलेला तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा ठराव अमान्य करण्याचा अधिकार कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल (सुधारणा) कायदा १९९४ मधील कलम ५ (३) मध्ये केलेल्या बदलानुसार राज्य सरकारऐवजी राज्य निवडणूक आयुक्त पालिका निवडणुकीसाठी वॉर्ड ठरविणे, वॉर्डच्या सीमा निश्चित करणे तसेच प्रत्येक वॉर्डातील उमेदवारांची संख्या ठरविणे हे अधिकार मिळतात, हे न्यायालयाने स्पष्ट करावे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.