- वाचा… पत्रकार परिषदेत डॉ. कदम काय म्हणाले?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कॉंग्रेसची विचारधारा पोहचविण्याचे काम पक्ष श्रेष्टींनी माझ्यावर दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. ज्या प्रमाणात महापालिका कर आकारते त्या प्रमाणात आरोग्य, पाणी, रस्ते याच्या सुविधा मिळत नाहीत. या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवण्याचे आणि सामान्य नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम यापुढे शहर कॉंग्रेस करेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी (दि. १२ ऑक्टोबर) चिंचवड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, मी माझ्या महाविद्यालयीन काळापासून कॉंग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता आहे. रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी मला दि. ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी नियुक्त पत्र दिले. कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर सोपावलेली ही जबाबदारी यशस्विरित्या पार पाडेल. मागील साडेचार वर्षापासून भाजपाचा सुरू असणारा भ्रष्टाचार, पवना बंद जलवाहिनी, बीआरटी अशा विविध प्रश्नांवर मी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. यासाठी शहरातील माजी अध्यक्षांना, सल्लागारांना काँग्रेसच्या सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना, माजी नगरसेवक, नगरसेविका आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार या सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करण्यासाठी वेळ कमी आहे. शक्य तेवढ्या लवकर मी शहर कार्यकारणी जाहीर करणार आहे. या कार्यकारणी मध्ये सर्व समाजातील सर्व समाज घटकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.