- आयुक्तांकडून शिक्कामोर्तब होताच आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या तीन सदस्यीय निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रारूप आराखडा पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. पालिकेच्या २५ अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत काम केले जात आहे. सन २०११ च्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येनुसार शहरात एकूण ३ हजार १०२ गटानुसार (ब्लॉक) रचना केली जात आहे. एका प्रभागात सरासरी ३७ हजार लोकसंख्या असणार आहे.
नैसर्गिक सीमा कायम ठेऊन व लोकसंख्येचे गट न फोडता रचना केली जात आहे. २०११ जनगणनेनुसार फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी ४ सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन आणि ऑटोकॅड संगणक प्रणालीद्वारे रचना करण्यात आली होती. आताही तीच लोकसंख्या व गट असल्याने ३ सदस्यीय प्रभागरचना करणे अधिक सुलभ झाले आहे. प्रभाग रचनेची सुरूवात उत्तरेकडील तळवडे चिखलीकडून सुरू होऊन उत्तर पूर्व करून दणिक्षेकडील दापोडी बोपखेल, सांगवी येथे शेवट केला जाणार आहे. त्या क्रमाने प्रभाग असणार आहेत. यंदा जीएसआय (जिऑग्रॉफीक इन्फॉर्मेशन सिस्टिम) प्रणालीद्वारे प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यामुळे किमान ४ दिवसांत आराखडा तयार केला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.
समितीने तयार केलेल्या आराखड्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी शिक्कामोर्तब करताच तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. आयोगाने आराखडा स्वीकारल्यानंतर एकाच दिवशी कच्चा आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत काढली जाईल. ही प्रभाग रचना स्वीकारल्यानंतर त्यावर सुनावणी होईल. राज्य आयोगाने प्रभाग रचनेस अंतिम मंजुरी दिल्यानंतर जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक कार्यक्रम राबविला जाणार आहे, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.