- कामगारांना तब्बल १२५०० रुपयांची घसघशीत पगारवाढ..
- कामगारांचे आर्थिक जिवनमान पगारवाढीमुळे नक्कीच उंचावणार – शिवसेना उपनेते सचिन अहिर..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- कोरोनामुळे कामगारांवर मोठे संकट उभे राहिले. लॉकडाऊन लागल्यामुळे कंपन्या बंद पडल्या. कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली. मात्र बंद उद्योग सुरळीत होताच कामगारांमुळेच कंपन्या आणि कारखान्यांचा प्रगतीचा आलेख उंचावला. त्याचे खरे श्रेय कामगारांना जाते. चाकणमधील या कंपनीने कामगारांना पुढील तीन वर्षांसाठी तब्बल १२५०० रुपयांची घसघशीत पगारवाढ केली आहे. ही कामगारांसाठी ऐतिहासिक वेतनवाढ असून कामगारांचे आर्थिक जिवनमान यामुळे नक्कीच उंचावणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले.
चाकण येथील महिंद्रा सीआयई अॅटोमोटिव्ह गीअर्स डिव्हिजन आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेत आज शुक्रवारी (दि. २२) रोजी वेतनवाढ करारावर स्वाक्षरी झाली. त्याप्रसंगी सचिन अहिर बोलत होते. यावेळी व्यवस्थापनाकडून कंपनी प्रतिनिधी राॅनी जाॅहन, संदीप राणे, शैलेश कुलकर्णी, चिराग दवे, अनिल देशमुख, ज्योतिबा पाटील, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय काळोखे, ईश्वर वाघ, कामगार प्रतिनिधी प्रतिनिधी प्रमोद शिंदे, संजू सूर्यवंशी, राकेश नलावडे, उमेश ठाकरे, महेश राखुंडे, राहुल पाटील व मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता. यावेळी उपस्थित कामगार प्रतिनिधिंचा सत्कार करण्यात आला.
या वेतन करारात कंपनी ते राजगुरूनगर बससेवा, रजावाढ, टर्म इन्शुरन्समध्ये कंपनीचा सहभाग, दिवाळीभेट, मनोरंजन निधितवाढ, बोनसमध्ये वाढ, फरकाची शंभर टक्के रक्कम मिळणार अशा ठळक गोष्टींचा समावेश आहे.
सचिन अहिर पुढे बोलताना म्हणाले, संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांसाठी कंपनीचा हा तिसरा वेतनवाढ करार आहे. कोविडमुळे अनेक कारखाने अवसायानात निघाले. अनेक ठिकाणी कामगारांवर पगारवाढ नको फक्त पगार वेळेत करण्याची वेळ आली होती. मात्र आता चित्र बदलतेय. इतर कंपन्यांपेक्षा सर्वात जास्त पगारवाढ यंदा महिंद्रा सीआयई कंपनीत झालीय. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार व मालक यांच्यात दुवा बनून कामगारांसाठी समाधानकारक वेतनवाढीसाढी परिश्रम घेतले. त्यामुळेच कामगारांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी प्रामाणिक काम करून कंपनीला शिखरावर पोहोचवावे जेणेकरूण भविष्यात आत्मसन्मानाने जगता येईल. कामगारांनी इंटरनल युनियनच्या मागे धावू नये त्याला मर्यादा येतात. एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन केले.
विजय काळोखे म्हणाले, वेतनवाढीसाठी व्यवस्थापनाकडून चांगले सहकार्य मिळाले. कोविड काळ असूनही कंपनीकडून चांगली वेतनवाढ मिळाली. अडचणीच्या काळात कामगारवर्गाने सहकार्याची भुमिका घेतली. भविष्यात समोपचाराने काम करून सर्वांना पुढे न्यायचे आहे.
व्यवस्थापन प्रतिनिधी राॅनी जाॅहन म्हणाले, कामगारांच्या समस्या सोडविण्यावर कंपनीचा नेहमी भर असतो. युनियन प्रतिनिधी आणी व्यवस्थापनाकडून अभ्यासपुर्ण वेतनवाढीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतरच कामगारांच्या हितांचा विचार करून कंपनीने पगारवाढ दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहित लामखडे, वेतनकराराचे सारांश वाचन राकेश नलावडे यांनी तर, आभार ईश्वर वाघ यांनी मानले.