न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे, त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे.
हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक १ मे रोजी पुणे मुंबई दुचाकी रॅली काढून निषेध करणार आहेत.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून या रॅलीस रविवारी सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होईल. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शुक्रवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.