न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- समतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणारे राजर्षी शाहू महाराज सर्वार्थाने लोकराजे होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज एक विचार आहे. हा विचार जपण्यासाठी, महाराजांना अपेक्षित असणारा सामाजिक न्याय साधण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
राजसत्ता उपेक्षित, वंचित घटकांसाठी वापरुन आदर्श निर्माण करणा-या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी दिनी महापालिकेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक संजीव भांगले, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
मागासलेल्या वर्गांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राखीव जागांची तरतूद प्रथम शाहू महाराजांनीच केली. आपल्या अधिकारांचा वापर जनसामान्यांच्या विकासासाठी कसा करावा, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय, असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यावेळी म्हणाले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारखे स्त्री हक्काच्या, परिवर्तनाच्या चळवळीस पुढे नेणारे निर्णय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतले, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली असे अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, शाहु महाराजांनी अनिष्ट रुढी, परंपरा उच्चाटनासाठी सातत्याने प्रयत्न केले. सिंचन, शिक्षण, कला, क्रीडा, नाट्य, उद्योग, व्यापार, दळणवळण, आरोग्य आणि शेती अशा मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात शाहू महाराजांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.