संजय राऊतांचे ते वक्तव्य शिरूरमध्ये परिवर्तन घडविणार?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते खेडमधील आंबेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राऊत यांनी पुढे म्हटलं की, शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आढळरावांनी शिरूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, असंही राऊत यावेळी म्हणाले.