- पालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांचा त्रागा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२२) :- महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडलेल्या जनसंवाद सभेत आजपर्यंत १ हजार २० नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला आहे. विविध समस्यांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी तसेच महत्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव प्रशासकीय कामकाजात करून घेण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरले आहे.
महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पदावधी संपल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांची शासनाने प्रशासक म्हणून नेमणूक केली. नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त पाटील यांनी जनसंवाद सभेचा उपक्रम सुरु केला. दि. २१ मार्च २०२२ पासुन दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सुरु झालेल्या महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा सुरु झाल्या. मुख्य समन्वयक अधिका-यांची नेमणूक करून त्यांना जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषवण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले.
प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षमपणे राबवण्यासाठी जनसंवाद सभांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरली आहे. तिस-या जनसंवाद सभेत सर्वाधिक १८१ नागरिकांनी सहभाग नोंदवला, तर सातव्या जनसंवाद सभेत सर्वात कमी ९८ नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. आजपर्यंत झालेल्या जनसंवाद सभेत ‘अ’ प्रभागात सर्वाधिक १८७ नागरिकांनी सहभाग नोंदवला तर सर्वात कमी ‘क’ प्रभागात ६४ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, मलनि:स्सारण व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापना संदर्भात नागरिकांनी या जनसंवाद सभेमध्ये तक्रारीवजा सूचना केल्या. यातील बहुतांश तक्रारींचे निराकारण क्षेत्रीय स्तरावर तात्काळ करण्यात आले. धोरणात्मक बाबींसंदर्भात असलेल्या सूचनांवर धोरणात्मक निश्चितीकरीता कार्यवाही सुरु करण्यात आली. वारंवार येणा-या तक्रारींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करण्यात आले. त्यामुळे वारंवार येणा-या त्याच त्याच तक्रारींचे प्रमाण कमी झाले असून नागरिकांनी देखील याबद्दल समाधान व्यक्त केले. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर महापालिकेने केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत केले जात असून यामाध्यमातून नागरी सुसंवाद वृध्दींगत होत आहे. नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे जनसंवाद सभेचे उद्देश सफल होत असून या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील सुसंवाद शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याची भावना आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आजच्या जनसंवाद सभेत सुमारे ११४ नागरिकांनी सहभाग घेऊन म्हणणे मांडले. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १८, ११ , ६ , ८ , १३ , ७ , २६, आणि २५ नागरिकांनी आपले म्हणणे मांडले.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.
क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत संबंधित सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य, जलनि:स्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
आजपर्यंत झालेल्या सर्व जनसंवाद सभांमध्ये अ,ब,क,ड,इ,फ,ग,ह प्रभागनिहाय एकूण अनुक्रमे १८७,१३०,६४, ९९,१११,१०७,१७६,१४६ इतक्या लोकांनी आपले म्हणणे मांडले आहे.