न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे. २०२२) :- नवीन शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना जाडजूड दफ्तर आणावे लागणार नाही. केवळ एका पुस्तकावर पहिल्या तिमाहीचे शिक्षण दिले जाईल.
आता दप्तराचा भार हलका करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकामध्ये सर्व विषयांचा पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना दररोज वर्षभराच्या अभ्यासाची सर्वच पुस्तके शाळेत घेऊन येण्याची गरज पडणार नाही. वर्षातील चार शैक्षणिक सत्रांसाठी केवळ चार पुस्तके असतील असे प्रा गायकवाड म्हणाल्या.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ मल्टी लँग्वेजेस इंटिग्रेटेड बुक ‘ असतील. या वर्षात यश मिळाल्यानंतर त्यापुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अभ्यासक्रम लागू होईल.