- वारकऱ्यांसाठी गावातील मुलभूत सुविधा सज्ज; उद्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२२) :- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू नगरपंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली आहेत, त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नगरपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. देहूत विविध ठिकाणी ८०० फिरती स्वच्छतागृह सोमवारी ठेवण्यात आली.
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारकऱ्यांना सोयी मिळाव्यात, यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाची लगबग सुरु आहे. वारीसाठी आलेल्या भाविकांना यंदा नगरपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी सांगितले, की गावातील रस्त्यांवर मुरूम टाकून साईडपट्टी भरली आहे. रुंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही.
पालखी सोहळ्यापूर्वी गावातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी नगरपंचायत प्रशासनही जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी ३० कर्मचारी तैनात केले आहेत. सध्या इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्ते, गटारे यांची साफसफाई सुरु आहे. २० जूनला प्रस्थान असल्याने दोन दिवस अगोदर दिंड्या, भाविक दाखल होतात. त्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
गावातील विहीर, हातपंपाची दुरुस्ती सुरू आहे. तसेच पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली आहे. गावात विकास आराखड्यातंर्गत २६० स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. विना मोबदला भाविकांना स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. तसेच निर्मलवारीसाठी ८०० फिरते स्वच्छतागृह विविध १३ ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. गावातील विजेच्या खांबावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप केंद्राकडून दोन दिवसात गावात औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएल पावडरचा साठा उपलब्ध केला आहे. धूर फवारणीसाठी चार मशिन उपलब्ध आहेत. माळवाडी, विठ्ठलवाडी या गावातही भाविक मुक्कामी असतात.