- भाजप बहुमतापासून हाकेच्या अंतरावर; मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत.या निवडणुकीत फक्त भाजपचा विजयच झाला नाही तर ते बहुमतापासून आता अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपले आहेत.
भाजपला विधानपरिषद निवडणुकीमध्ये एकूण १३३ पहिल्या पसंतीची मतं पडली आहेत. यात राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३०, प्रविण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७ आणि प्रसाद लाड यांना २८ मतं पडली आहेत. यातल्या उमा खापरे यांचं एक मत बाद झाल्यामुळे भाजपला मिळालेल्या पहिल्या पसंतीची मतं १३४ एवढी आहे.
२८८ आमदारांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी १४५ मतांची गरज आहे, म्हणजेच भाजप बहुमतापासून ११ मतं लांब आहे. विधानपरिषद निडणुकीमध्ये २८५ आमदारांनी मतदान केलं. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये असल्यामुळे तर शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाल्यामुळे विधानसभेची संख्या ३ ने कमी झाली आहे.
त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. भाजपकडून या १३ आमदारांना प्रलोभने दाखवून आपल्याकडे वळविण्याचे मनसुबे असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. असे झाले तर महाविकास आघाडीची सत्ता उलथवून भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकतो.