- वीज समस्येने हैराण झालेल्या नागरिकांनी ठिय्या मांडत दिला उपोषणाला मोठा पाठिंबा..
- सर्व वीज समस्या तात्काळ सोडविण्याचं अति. कार्यकारी अभियंत्यांच उपोषणकर्त्यांना आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. ११ जून २०२४) :- महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रभाग क्र. १५ आकुर्डी-निगडी प्राधिकरणातील सेक्टर नं. २३, २४, २५, २६, २७, २८, गंगानगर, आकुर्डी गावठाण, निगडी गावठाण येथील नागरिकांच्या वीज समस्येची दखल घेऊन आज मंगळवारी (दि. ११) रोजी शहर भाजपच्या व निगडी प्राधिकरण रेसिडेन्शिअल फोरमच्या वतीने मा. उपमहापौर शैलजा मोरे, मा.नगरसेविका सौ शर्मिला बाबर यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
प्राधिकरणातील महावितरण कार्यालयाच्या आवारात वीज समस्येने हैराण झालेल्या नागरिकांनी ठिय्या मांडत या उपोषणाला मोठा पाठिंबा दिला. वीज समस्या सोडविण्याची मागणी केली. शांततेत पार पडलेल्या या उपोषणात माजी उपमहापौर शैलजाताई मोरे , सौ शर्मिला बाबर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा स्मरणपत्र दिले. येत्या काही दिवसात वीज समस्या न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी महावितरण विभागास दिला आहे.
या उपोषणात आमदार उमा खापरे, मा. नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, चिंचवड स्टेशन निगडी प्राधिकरण मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, जयदीप खापरे, बाळा शिंदे, सलीम शिकलगार, आर एस कुमार, समीर जवळकर, अरुण थोरात, अतुल इनामदार, मनोज देशमुख, अर्जुन दलाल, जिगर व्यास, सचिन कुलकर्णी, निगडी प्राधिकरण रेसिडेन्शियल फोरम सदस्य व प्रभागातील नागरिक आदी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर शैलजाताई मोरे म्हणाल्या, प्राधिकरणातील नागरिक वेळेवर वीजबिल भरतात. तरीसुद्धा नागरिकांना वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या स्थानिक नागरिक वर्षानुवर्ष सहन करत आहेत. येथील नागरिक वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्येला त्रस्त झालेले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होतात. ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांना या समस्येचा त्रास होतोय. विज गेल्यानंतर महावितरणच्या कार्यालात फोन केला असता कर्मचारी वेळेवर फोन उचलत नाहीत. प्रभागातील अनेक ठिकाणी विजेच्या केबल जुन्या झालेल्या आहेत. याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठका घेऊनसुद्धा या समस्यांवर उपाययोजना होत नाही. त्यामुळे आज आम्ही महावितरणाच्या विरोधात एकदिवसीय उपोषण केले. आता तरी, येथील कारभार सुरळीत होईल, अशी आम्हाला आशा आहे. या समस्या न सुटल्यास यापुढे आम्ही आमरण उपोषणाचा इशारा महावितरणला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान महावितरणच्या वतीने उपोषणाची दखल घेतली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी येत्या काही दिवसात वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले आहे. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली असल्याची माहिती माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी दिली.
मा. नगरसेविका शर्मिला बाबर यावेळी बोलताना म्हणाल्या, महावितरणच्या गैरकारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. शाळांच्या सुट्ट्या संपल्या आहेत. त्यामुळे आता शाळा सुरु झाली आहे. घरात लाईट नसल्यामुळे मुलांचा अभ्यास राहून जातोय, तसेच महिला-जेष्ठ नागरिक यांनासुद्धा दैनंदिन कामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे विजेची सोय कायमस्वरूपी व्हावी.
महावितरणचे निगडी-प्राधिकरण उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता टेस्टिंग व्हॅनची संख्या वाढविण्यात येईल. कामचुकार ठेकेदारांवर कारवाई केली आहे. एच टी केबल नादुरुस्त करणाऱ्या संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. परिसरातील विजेचे मेंटेनन्सची कामे, डीपी बॉक्स दुरुस्ती करण्यात येईल, उपरी वाहिन्या भूमिगत करण्याबाबत प्रस्ताव पाठवू, वीजबिल वाटप आणि दुरुस्तीसाठी ठेकेदारांना सक्ती केली आहे, ग्राहकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती भाजपचे अनुप मोरे यांनी दिली आहे.