न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडावी यासाठी, मराठा समाज १७ सप्टेंबर रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, मराठा समज आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येक वर्षांपासुन लढा देत आहे. मात्र आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने, समाजातील तरुणवर्ग चिंतेत पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांना विनंती करावी.आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र त्या दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा न करता गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
आता या आरक्षणाच्या स्थगितीबाबत मराठा समाज गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी यांना घेराव घालून निषेध करणार आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.