- पाणीप्रश्नावरून उपमहापौर घुलेंनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची घेतली शाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- मागील आठ दिवसांपासून दिघी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठयामुळे दिघीकर त्रस्त आहेत. त्यामुळे दिघीतील पाणीपुरवठा येत्या पाच दिवसांत सुरळीत करावा. अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
भोसरीतील पंप हाऊसमधून दिघीला पाणीपुरवठा केला जातो. तेथील पाण्याची लेव्हल कमी झाली की दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. मागील आठ दिवसांपासून दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यापार्श्वभूमीवर उपमहापौर घुले यांनी सोमवारी (दि.१२ ) पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, उपअभियंता दिनेश पाठक, विजय वायकर, चोवीस बाय सात योजनेचे काम करणारे कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.
उपमहापौर घुले म्हणाल्या, “दिघीतील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून विस्कळीत आहे. नागरिकांचे खूप हाल झाले आहेत. लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही विस्कळीतपणा येत आहे. लोकांचे हाल होत आहेत. दिघीतील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये. नियमितपणे आणि उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे. येत्या पाच दिवसांत दिघीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा”.