न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील पक्षीप्रेमी व अभ्यासक यांनी मागील तीन वर्षातील (सन २०२०,२१,२२) नोव्हेंबर व डिसेंबर,जानेवारी या तीन महिन्यात इंद्रायणी नदी परिसरात अन्नाच्या शोधात येणाऱ्या विविध पक्षांच्या आकडेवारीचा (संख्येचा) अभ्यास केला. पक्षीप्रेमींसाठी चिंताजनक बाब लक्षात आली आहे. सदरचे पक्षी निरीक्षण येलवाडी व देहू इंद्रायणी नदी परिसरात करण्यात आले.
पक्षी निरीक्षणात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत, विशाल शेवाळे, अजय घाडी, सुकेश येरूनकर, तेजस सापरिया, नितीन मांडवे, राजेश बाबर, अर्चना घाळी,अँड विद्या शिंदे, यांनी नदी परिसरातील पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला.
पावसाळा संपल्यानंतर व थंडीचे आगमन होत असणाऱ्या काळात म्हणजेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या काळात इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली असते. वाढते नदी प्रदूषण व सांडपाण्याच्या अतिरेकामुळे येथील पाणी सुद्धा गढूळ झाले आहे. येलवाडी देहूचा कमी वर्दळीचा असलेला नदी परिसर तसेच या ठिकाणी असलेले मोठ्या रुंदीचे नदीपात्र या दोन्ही पूरक गोष्टीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये हा परिसर पक्ष्यांना आकर्षून घेतो. इंद्रायणीच्या वाहत्या पाण्याचे प्रमाण ह्या महिन्यात कमी होत असल्याने पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात या परिसरात तयार होतात. त्यामुळे ह्या पाणथळ जागा पक्ष्यांना आकर्षून घेतात. पुणे जिल्ह्यातील येलवाडी गावाचा ग्रामीण भाग, वारकरी सांप्रदायाची तिर्थनगरी म्हणून प्रसिद्ध असलेला देहूगावचा हा भाग आता वाढत्या शहरीकरणाच्या विळख्यात सापडू लागला आहे. तीन वर्षांत नदी किनारी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन बांधकामे, निवासी गृहसंकुले उभी राहिली. त्यामुळे पूर्वी नदीकिनारी दिसत असलेली दाट बाभळीची व लिंबाची झाडे आज कमी दिसून येतात. अनेक झाडे वृक्षतोडीची बळी ठरली. पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान त्यामुळे धोक्यात आले. प्रदूषित पाण्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन त्यातील किडे व जलचरांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पक्षांच्या अन्नसाखळीवर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. खंड्या ,धनेश सारख्या पक्ष्यांचे अन्न हे नदीच्या पाण्यातील मासे असते, प्रदूषित पाण्यामुळे, व जलपर्णीमुळे ह्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात कमी झाले त्यामुळे ह्या पक्ष्यांनी अन्यत्र आपली वाट वळवली असण्याची शक्यता आहे. पूर्वी सुगरणीची घरटी नदीकाठच्या बाभळीच्या झाडावर दिसून येत होती. मात्र आता झाडेच नामशेष झाल्यामुळे पक्ष्यांनी अन्यत्र स्थलांतर केले असावे, असे पक्षी निरीक्षीणात आढळून आले.
या संदर्भात पर्यावरण अभ्यासक व समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” गेल्या १० वर्षांपासून इंद्रायणी नदी संवर्धन फक्त कागदावरच दिसून आले, १ कोटींपेक्षा जास्त रुपये ठेकेदारांना जलपर्णी काढण्यासाठी अदा केले गेले. प्रत्यक्षात मात्र एकही दिवस ह्या ठिकाणी प्रामाणिक काम दिसून आले नाही. अश्यामुळे पक्षांची अन्नसाखळी तुटली असून भविष्यात इंद्रायणी काठी होत असणारे पक्षी दर्शन इतिहास जमा होण्याची शक्यता वाढली आहे. आताच बोटावर मोजता येतील एवढ्याच पक्षाच्या जाती दिसून येत आहेत. पूर्वी ४० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी ह्या ठिकानी दिसून येत होते. मात्र आता ६ ते ७ प्रकारचे पक्षीच दिसून येतात. ही धोक्याची घंटा असुन. प्रशासनाने आता प्रामाणिकपणे इंद्रायणी-पवना- मुळा संवर्धन मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. तरच भविष्यातील आपली पिढी पक्षी दर्शन करू शकेल. “