न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे उद्या रविवारी (दि. २६ ) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पोलीस चौकी सुरु होत आहे. याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाल्हेकरवाडी परिसरात पोलीस चौकीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीस यश आले आहे. विजय पाटील यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील वाढते उपनगर वाल्हेकरवाडी येथे तातडीने पोलीस चौकी उभारण्यासाठी डीईपीटी/एचओएमडी/२०१७/४६५७ या क्रमांकाने शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास मुंबई मंत्रालयातूनही सहकार्य मिळाले. शहरातील वाढते उपनगर म्हणून वाल्हेकरवाडी ओळखले जाते, या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून गुन्हेगारीचा आलेखही वाढत जात होता. त्या संदर्भात समितीने वेळोवेळी मुंबई मंत्रालयात पाठपुरावाही केला. त्याची दखल घेऊन तत्कालीन चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि सहायक पोलिस उप निरीक्षक डी जी कांबळे यांनी प्राधिकरण सुरक्षा कृती समितीस वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा संदर्भात माहीती दिली.
१५/०२/२०१८ जावक क्रमांक ८८/२०१८, व २७/०२/२०१८ जावक क्रमांक १०७०/२०१८ या पत्रव्यवहारांची माहिती समितीस लेखी कळवली. उद्या वाल्हेकरवाडीत चौकी सुरू होत आहे. समितीच्या पाठपुराव्यास अखेर यश आले. समितीच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, सध्याचे सी ई ओ प्रमोद यादव, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहा.पोलीस उप निरिक्षक डी जी कांबळे यांचे अभिनंदन आणि पोलीस चौकीच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
या संदर्भात समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी उभारणेकरिता शासनाशी पाठपुरावा करीत होती, स्थानिक पोलीस प्रशासन, नवनगर विकास प्राधिकरण, आणि महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी समितीस या संदर्भात लवकरच पोलीस चौकी उभारत आहोत असे कळविले होते. समितीच्या सूचनांची दखल घेऊन उभारलेल्या चौकीचे कामकाज सुरू होत असल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीला नक्कीच आळा बसणार आहे.”