- नगरविकास विभागाकडून महापालिकेस बेशिस्तांवर कडक कारवाईचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- कोरोना संपला नसतानाही नागरिक मास्क न वापरताच बिनधास्त जाताना दिसून येत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये म्हणून जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश नगर विकास विभागाने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे.
पोलीस व महापालिकेच्या वतीने कडक कारवाई केली जाणार आहे. अनलॉक केल्याने नागरिक उद्योग धंदे, व्यापार, व्यवसायासाठी मोठचा प्रमाणावर बाहेर पडत आहेत. लोक बाहेर पडताना मोठ्या संख्येने मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करताना दिसत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये यासाठी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, कोरोना संपलेला नाही. दुस-या लाटेची भीती कायम आहे. मात्र, नागरिकांची बेफिकीरी मात्र कमालीची वाढली आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा नागरिकांच्या विरोधात आता मोहिम सुरु करण्यात आली असून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.