- पालिकेकडून जागतिक वसुंधरा दिवस साजरा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :- पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने निसर्गाशी समरूप होऊन आपली जीवनशैली विकसीत केल्यास निसर्गाचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडता येईल असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले. शहर स्वच्छ्ते बरोबरच ते हिरवेगार ठेवण्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या वतीने आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, उपआयुक्त अजय चारठाणकर, मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, सुषमा शिंदे, प्रशांत जोशी, निलेश देशमुख, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, आण्णा बोदडे, रविकिरण घोडके, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यासह विविध अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिका दरवर्षी झाडे लावत असते, यावर्षी ३ लाख झाडे लावण्यात येणार आहेत, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, धकाधकीच्या जीवनात आपले जीवन यांत्रिकी झाले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी आपली भूमिका नेमकी काय असते याचा विसर पडलेला दिसतो. नेम्के काय करावे हे समजत नाही. काही लोक मात्र झोकून देऊन पर्यावरण संवर्धनासाठी झटत असतात. बाकी लोक हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पर्यावरणाची हानी झाल्यामुळे आपल्या जीवनावर देखील त्याचा परिणाम होतो. प्रगती म्हणून आपण आपल्या उत्पन्नाकडे बघतो, जमिनीचे सिमेंटीकरण करण्याकडे आपला अधिक कल असतो, पायाला माती लागू नये असा आपला प्रयत्न असतो. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणून आपण या बाबींचा गांभीर्याने विचार करावा. ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन पर्यावरण पूरक असावे. नैसर्गिक प्रवाह रोखले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने अधिकाधिक झाडे लावून परिसर हरित ठेवला पाहिजे. वसुंधरेचे संवर्धन करण्यासाठी निसर्गाशी समरस व्हा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी ‘माझी वसुंधरा’ ही पर्यावरण रक्षणाची सामुहिक शपथ घेण्यात आली. संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘माती वाचवा’ या विषयावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पर्यावरण विभागाचे सहशहर संजय कुलकर्णी यांनी केले.