- मागासवर्गीय तरुणाला ठेचून जिवे मारल्याचे प्रकरण गंभीर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :- औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन मागासवर्गीय तरुणाचे हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण आणि लाठ्या-गाठ्यांनी ठेचून जिवे मारल्याची गंभीर घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये कायदा-सुव्यवस्था उरलेली दिसत नाही. महाराष्ट्रात आता जंगलराज सुरू झाले आहे का ? असा संतप्त सवाल लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यथ तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात अमित गोरखे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनोज शेषराव आव्हाड असं या खून झालेल्या मागासवर्गीय तरुणाचं नाव आहे. मनोज हा औरंगाबाद येथील हडको भागातील एका माजी नगरसेवकाच्या मंगल कार्यालयात कामाला होता. येथील लायटिंग चोरल्याच्या संशयावरुन आठ जणांच्या टोळक्याने २० एप्रिल २०२२ रोजी त्याचे हातपाय बांधून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. मनोज ओरडत होता. पण, त्या नराधमांनी त्याच्यावर कोणतीही दया दाखवली नाही. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून तो तरुणाच्या नातेवाईकांना पाठविल्याचे समोर आले. निर्दयीपणाचा कळस गाठल्याची ही संपूर्ण घटना आहे. या गुन्हेगाराने केलेले कृत्य आणि त्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना कायद्याची आणि पोलिस यंत्रणेची कोणतीही भिती नसल्याचे अधोरेखित होते.
या घटनेला सर्वस्वी राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलिसांवर वचक राहिलेला नाही. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही ? महाविकास आघाडी सरकारच्या काळात आता जंगलराज सुरू झाले आहे का ? हे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर उभे राहिले आहेत. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी गोरखे यांनी केली आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल…
या घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात समाजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे. या मारहाण आणि खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अन्यथा या घटनेमुळे महाविकास आघा़डी सरकारच्या विरोधात आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सुरू झालेल्या जंगलराज व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.