न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- केंद्र सरकारने श्रमिक कायद्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या विधेयकांना बुधवारी राज्यसभेची मंजुरी देण्यात आली. या विधेयकामुळे कामगारांच्या हिताचे आणि हक्काचे असलेले सर्व कामगार कायदे मोडीत काढले असून, कामगारांना संघटनेचा, संपाचा आणि न्याय मागण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. त्याचबरोबर सुमारे तीनशे कामगारांपर्यंत क्षमता असलेल्या कारखाने अस्थापनाना कामगाराना कधीही कामावरून काढून टाकता येणार आहे. त्याचबरोबर सुमारे एक हजार दिवस कामगार कायदे लागू नाही अशा प्रकारची स्थिती अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली असून, ही कामगारांना वेठबिगारी च्या खाईमध्ये लोटण्याचा प्रकार असल्याचे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
नव्या श्रमसंहिताबाबत आज श्रमिक कामगारांची बैठक चिंचवड येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, उमेश डोर्ले, भास्कर राठोड, दिनेश कदम, सुखदेव कांबळे, सुरेश देडे, नंदू अहिर, कालिदास गायकवाड, बबन लोंढे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
नखाते म्हणाले “विविध ठिकाणी कामगार एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून लढा देऊ शकतात मात्र, या धोरणामुळे संघटनेचे अस्तित्वच धोक्यात आले असून त्यामुळे त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. उद्योगस्नेही तसेच देशी-विदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या नावाखाली कामगार हिताला संपवले गेले आहे. कामगारांना साठ दिवसापूर्वी आगाऊ नोटीस दिल्या शिवाय संप, आंदोलन करता येणार नाही अशा बदलांमुळे कामगार हा दडपणाखाली राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर निरंतर काम करणाऱ्या कामगारांना एखाद्या आस्थापनांमध्ये कायमस्वरूपी काम मिळण्याची संधी आजपर्यंत होती. कंपनी व्यवस्थापनावर कामगारांना कायम करण्याचे कुठलेही बंधन राहणार नाही. देशातील कामगार मोठ्या प्रमाणात आंदोलन व त्याचबरोबर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही”.