न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा ( ईव्हीएम ) वापर थांबवण्याची मागणी करणारी एक याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे. एका वकिलाकडून ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ईव्हीएमच्या फेरफार वापरामुळे चुका घडू शकतात. ईव्हीएमच्या अचूकतेबाबत शंका निर्माण झाल्याने अनेक देशांनी त्याच्या वापरावर बंदी घातली. ईव्हीएमच्या निर्मितीवेळीच त्यामध्ये फेरफार केले जाऊ शकतात. त्यामुळे फेरफार करण्यासाठी कुठल्या हॅकरची गरज नाही. कुठलीही चूक न करणारे यंत्र अद्याप जगात कुठेच बनलेले नाही. त्यामुळे देशभरात ईव्हीएमचा वापर थांबवण्याचा आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावा.
पुढील निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर केला जावा, मतपत्रिका वापराची पद्धत अधिक विश्वनसीय आणि पारदर्शक स्वरूपाची आहे, अशी भूमिका याचिकेतून मांडण्यात आली आहे. देशातील विविध राजकीय पक्षांकडून आणि प्रामुख्याने विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जाते. मात्र, ईव्हीएम पूर्ण सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये फेरफार केला जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका निवडणूक आयोगाने वारवार मांडली आहे.